खरात हत्याकांड प्रकरण : संशयीत आरोपींनी केली जळगाव कारागृहात ठेवण्याची मागणी

भुसावळ : शहरातील समता नगरातील रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांच्या खून प्रकरणातील पाच संशयीतांना मंगळवार, 7 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त न्यायालयाच्या परीसरात लावण्यात आला होता. या खटल्यावर आता याच महिन्यात कामकाज होणार आहे. यावेळी संशयीतांनी जळगाव सबजेलला ठेवण्याची मागणी न्यायालयास केली.

पाच जणांची केली होती हत्या
समता नगरातील रहिवासी तथा माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांवर फायरींग, चाकू हल्ला करीत त्यांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या हत्याकांड प्रकरणी नाशिक कारागृहातून मंगळवारी संशयीत मयुर सुरवाडे, राजा बॉक्सर, राजू मोघे, गोलू खान व आकाश सोनवणे यांना पोलिस बंदोबस्तात न्यायालयात न्यायाधीश आर.एम. जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. प्रसंगी संशयीतांनी नाशिकऐवजी जळगाव कारागृहात हलवण्याची मागणी न्यायालयात केली. या प्रकरणी संशयीतांकडून अ‍ॅड. जगदीश कापडे, अ‍ॅड.स्वाती कापडे, अ‍ॅड. सुशील बर्गे, अ‍ॅड.लतीफ पिंजारी यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड.एस.डी.सोनवणे तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सत्यनारायण पाल यांनी युक्तीवाद केला.

गोलू खानने केला जामीनासाठी अर्ज
याप्रकरणातील संशयीत गोलू खान अजगर खान याने जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे, यावर फिर्यादीचे वकील सत्यनारायण पाल यांनी हरकत घेत फिर्यादी पक्षाला नोटीस न मिळाल्याने जामीन न देऊ नये, असे सांगितले. यावर न्यायालयाने नोटिस देण्यात येईल, सांगत फिर्यादीतर्फे मंगळवार, 14 ोजी जर होत न्यायालयात खुलासा सादर करावा, असे सांगितले.