जाणून घ्या; उन्हाळ्यात कशी घ्याल जनावरांची काळजी?

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। राज्यात उन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे वातावरण बदललेले आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील उष्णता शोषली जाते. शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते व शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन ताण येतो. जनावरांचे शारिरीक तापमान १०३ ते ११०अंश फॅरन्हाईट वाढू शकते.

अति तापमान, आर्द्रता, अतिरिक्त स्नायू काम, मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारी जड कामे, उन्हात अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा पुरेसे न मिळणे, उपाशी जनावरांकडून कामे करून घेणे, बैलगाडीसह उन्हात उभे ठेवणे, बैलांवरील ओझे कमी न करता त्यांना उन्हात उभे ठेवणे, बांधणे. गोठ्यांचे नियोजन व्यवस्थित नसणे, खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणा, पत्र्याचे छत. दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे. सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात शिरणे. गाई, म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेणे. चरून आल्यावर मुबलक पिण्याचे पाणी न मिळणे. भर उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतणे.
वाढलेले शारीरिक तापमान हे उष्माघाताचे प्रथम लक्षण आहे. जनावराच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो व धापा टाकते, तोंडावाटे श्वास घेतो. त्वचा कोरडी व गरम पडते. खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करते. सुरवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सतत लाळ गळते. जनावरास तहान लागते, जनावर हे पाण्याच्या स्त्रोताकडे जाते, पाण्यामध्ये बसण्याचा किंवा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते. जसजशी शारीरिक तापमानात वाढ होते, तसतसे जनावर धाप टाकते. अशा अवस्थेत कोसळून खाली पडणे, ग्लानी येणे. घाम गेल्यामुळे, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे असंतुलन होऊन अशक्तपणा येतो. सोडियमची कमतरता झाल्यास जनावरांमध्ये पाणी पिण्याची इच्छा मरते. पाण्याची कमतरता निर्माण होते. तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे पोटदुखीची लक्षणे दिसतात. प्रामुख्याने उठबस करणे, पाय झाडणे, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट शेण टाकणे ही लक्षणे दिसून येतात.
जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असतांना चरण्यास सोडावे. हवामानपुरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची ऊंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छप्पराला शक्यतो पांढरा चुना/ रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा/ तुराट्या/ पाचट टाकावे, ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. बर्फाचे खडे हे चघळावयास द्यावेत. त्याचप्रमाणे ते अंगावर, डोक्यावर फिरवावेत. परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत, मुक्त संचार गोठयाचा अवलंब करावा. गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाने, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.
बैलाकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. त्यांना पिण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार (Animals in Summer) पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा. उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो गारवा असलेल्या भागात त्यांना चारा टाकावा. म्हशीच्या कातडीचा काळारंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी. योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे. पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत.