विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती वापरणार धक्कातंत्र? ‘मविआ’ची पुन्हा मतं फुटणार?

मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्यात असून या निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १२ जूलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारतंय? याकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. याचदरम्यान महायुतीच्या गटातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

महायुती उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान पॅटर्न निश्चित करत असल्याची माहिती मिळतेय. या निवडणुकीसाठी महायुतीने महत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. २०२२ च्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वापरलं होतं, तसंच पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत महायुतीची असल्याचं दिसत आहे.

दोन दिवसांपुर्वी वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं देखील समोर येतंय. यात महायुती उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर सुत्रांनी दिली होती.

अपक्ष आमदारांसोबतच कॉंग्रेसचे ३ ते ४ तर ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या गळाला लावण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तिन उमेदवार दिल्याने चुरस अजूनच वाढली आहे. त्यामुळेच महायुती अलर्टमोडवर आल्याचं दिसतंय. होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.