---Advertisement---
जळगाव : पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे. अशात पुन्हा आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी शेतकरी आणि नागरिक दोघांचीही चिंता वाढणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली, तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
चांगल्या पावसाची प्रतीक्षा
दरम्यान, जून महिन्यात जिल्ह्याने सरासरी गाठत १२४ मिमी पावसाची नोंद केली असली, तरी जुलै महिन्याची आकडेवारी मात्र चिंताजनक आहे. १६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ६० मिमी पाऊस झाला आहे, जो या कालावधीतील सरासरी ९७ मिमीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के आहे. याचा अर्थ जुलै महिन्यात तब्बल ३८ टक्के पावसाची तूट दिसून येत आहे.
मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर मुख्य पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा असताना आगामी काळातही पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांचीही चिंता वाढणार आहे.