एलआयसी, एसबीआयचा पैसा अदानींच्या कंपनीत जातो; विरोध केला तर ईडी,सीबीआय मागे लागते

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका अदानीजींना हजारो कोटी रुपये देतात. एलआयसी आणि एसबीआय सारख्या बँकांचा यात समावेश आहे. या बँकांचे पैसे, एलआयसीचे पैसे अदानीकडे जात आहेत. त्यांच्या विरोधात कोणी उभे राहताच ईडी, सीबीआयच्या तपास यंत्रणा मदतीला धावून येतात. काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गचा अहवाल आला होता. अदानींच्या शेल कंपन्या देशाबाहेर आहेत असे सांगण्यात आले होते. या शेल कंपन्या हजारो कोटी रुपये पाठवत आहेत, हा पैसा कोणाचा आहे, असा सवालही त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, माझ्या भारत जोडो यात्रेदरम्यान तमिळनाडू, केरळपासून हिमाचलपर्यंत प्रत्येक राज्यात अदानींचेच नाव ऐकू येत होते. तरुण विचारायचे की, आम्हालाही अदानींसारखा स्टार्टअप सुरू करायचे आहे. ते ज्या व्यवसायात हात घालतात, त्यात यशस्वी होतात. यापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांमध्ये ६०९ व्या क्रमांकावर होते. अशी काय जादू घडली की नऊ वर्षांत ते दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले.

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौर्‍यांमध्ये अदानींना फायदे दिले जातात, असा आरोपही राहुल गांधींनी केला. पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अदानींना कर्ज देते. मोदीजी जगभर फिरतात तेव्हा काय केलं जातं. ते बांगलादेशात जातात, तिथे बांगलादेशला वीज विकण्याचा निर्णय होतो आणि काही दिवसांनी बांगलादेश अदानींसोबत २५ वर्षांचा करार करतो. यानंतर श्रीलंकेवर दबाव आणून पीएम मोदी एक मोठा विंड प्रोजेक्ट अदानींना मिळवून देतात. हे अदानींसाठीचे परराष्ट्र धोरण आहे.