जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हयात बेमोसमी पावसाने थैमान घातले आहे. परिणामी सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला आहे. अशात जीव पडल्याने एक महिला व एक बैल ठार तर एक शेतकरी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरूवातीलाच तप्त उन्हाचा तडाखा असतानाच गत सप्ताहात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. यात रब्बी हंगामातील केळी बागायती पिकांसह ज्वारी, बाजरी, मका आदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला आहे.
वीज पडून महिलेचा मृत्यू
जामनेर तालुकयातील मौजे बिलवाडी येथे हिराबाई गजानन पवार (वय ३५) यांचा वीज पडून मृत्यू झाला. याबाबत आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे निर्देश दिले. नैसर्गिक आपत्ती निवारण निधींतर्गत शासकीय नियमानुसार चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.
शेतमजुर जखमी
अमळनेर तालुक्यातील खर्दे येथे शेतमजूर राहुल बारेला हा शेतात कुट्टी करत होता. यावेळी अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे तो बैलगाडी खाली येऊन बसला. दरम्यान, अचानक वीज पडल्याने एक बैल जागीच दगावला, तर राहुलसह इतर जनावरे जखमी झाली. राहुलवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.