मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी लढणार विधानसभा निवडणूक!

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला तीनही पक्षांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच निवडणुकीआधी मविआकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नसल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षातील इतर नेते आणि काही नवनियुक्त खासदारही सहभागी होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत काँग्रेस नेतृत्वाकडून आपल्याला आगामी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची असल्याचं राज्यातील नेत्यांना सांगण्यात आलं. तसंच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधी ठरवला जाणार नसल्याचं सांगण्यात आल्याचे समजते. लवकरच मित्रपक्षांसोबत समन्वयासाठी एक समिती बनवा आणि संयुक्त रणनीतीवर काम करा अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात आम्ही लोकसभा प्रतिकुल परिस्थितीत लढल्या. जनतेनं मविआला पाठिंबा दिला. महाराष्ट्राला देशातील विकसित आणि समृ्द्ध राज्य बनवायचं आहे. परंतु भाजपा सरकारने लोकांना महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात टाकलं. राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय झाला. देशात परिवर्तनाचं चित्र आहे महाराष्ट्राने याचे स्पष्ट संकेत दिलेत. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.