Manipur violence : संसदेत पडसाद, पंतप्रधानही संतापले; मणिपूरमध्ये असं का घडलं?

Manipur violence : मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. याचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र, बुधवारी माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली. अर्थात दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता. देशभरातून या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, या व्हिडीओचे संसदेतही पडसाद दिसले, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपींना सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र हे सर्व कशासाठी? अचानक मणिपूरमध्ये असं काय घडलं की इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे. त्यामुळे हिंसा का? आणि कशासाठी होतेय ते जाणून घ्या.

मणिपूरमधील भौगोलिक स्थिती समजून घ्या, मणिपूरची राजधानी इम्फाळ असून क्षेत्रफळाच्या 10 टक्के आहे. राज्यातील जवळपास 57 टक्के लोकसंख्या या भागात वास्तव्यास आहे. उर्वरित 90 टक्के भाग हा डोंगराळ प्रदेशात आहे. त्यामध्ये 43 टक्के लोक राहतात. राजधानी इम्फाळमध्ये मैतेई समाजाचे लोकं राहतात जे हिंदू आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मणिपूरच्या लोकसंख्येमध्ये मैतेई समाजाचे 53 टक्के लोक आहेत. विधानसभेतील 60 जागांपैकी 40 आमदार हे मैतेई समाजाचे आहेत. राहिलेल्या पर्वतीय आणि डोंगराळ भागांमध्ये 33 मान्यताप्राप्त जमाती राहतात. यामध्ये नागा आणि कुकी या मुख्य जमाती असून या ख्रिस्ती आहेत. त्यासोबतच मणिूपूरमधील 8 टक्के मुस्लिम समाजाचे लोक आहेत.

भारतीत संविधानानुसार कलम 371सी नुसार मणिपूरच्या पर्वतीय आणि डोंगराळ भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विशेष दर्जा आणि सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे ‘लँड रिफॉर्म अॅक्ट’ या कायद्यामुळे मैतेई समाजाच्या लोकांना पर्वतीय भागांमध्ये जमीन खरेदी करता येऊ शकत नाही. मात्र ज्या इतर जमाती आहेत त्यांना तिथे स्थायिक होण्यासाठी कोणतंही बंधन नाही. त्यामुळे दोन्ही समाजामधील मतभेद वाढले आहेत.

मणिपूरमधील चुरचंदपूर जिल्ह्यामध्ये खरी वादाला सुरूवात झाली. या भागात कुकी आणि नागा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. सरकारी जमीन सर्वेक्षणाच्या निषेधनार्थ 28 एप्रिलला द इंडिजेनस ट्राइबल लीडर्स फोरमने आठ तासांच्या बंदची घोषण केली. या बंदने हिंसक रूप धारण केलं. कारण त्याचदिवशी वनविभागाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि आणि कुकी आदिवासी आमने-सामने आले होते.

या घटनेनंतर पाचव्या दिवशी 3 मेला ‘ट्राइबल स्टूडेंट्स यूनियन ऑफ मणिपुर’ने आदिवासी एकता मार्च काढला. यामध्ये त्यांनी मैतेई समाजाला एसटी दर्जा देण्याच्या विरोधात होते. इथूनच या हिंसेला खरी सुरूवात झाली. मैतेई समाजाचे लोक या मार्चविरोधात एकत्र आले आणि त्यांनी विरोध केला.

एका बाजूला मैतेई समाजाचे लोक आणि दुसऱ्या बाजूला नागा आणि कुकी समाजाचे लोक आमनेसामने आले. काही वेळातच या हिंसेलाराज्यभर आक्रमक रूप आलं. 4 मेला चुरचंदपूर जिल्यामध्ये मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची सभा होणार होती, तयारी झाली होती मात्र तिथे मात्र त्या ठिकाणी आग लावण्यात आली. मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करण्यात आली. आतापर्यंत हिसेंची आग अजून धगधगत असून आतापर्यंत 150 पेक्षा लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 3 हजारांंपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमधील आरोपी कोण?
देशभर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये विवस्त्र अवस्थेतील महिला ही कुकी समाजाची असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ आताचा नाहीतर 4 मेचा असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांची मैतेई समाजाच्या लोकांनी धिंड काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे.