मनोज जरांगे आक्रमक; सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 15 दिवस आहे. दरम्यान आज त्यांनी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे.

उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिला नसल्याचे म्हणू नये. त्यामुळे असेही पंधरा दिवस गेले असून, सरकारला आणखी एक महिन्याचा वेळ देण्यात येत आहे. त्यांनी एक महिन्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.

मात्र, तीस दिवस संपल्यावर 31 व्या दिवशी राज्यातील एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या  उपोषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ हवा आहे अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सरकारला एक महिन्याचा वेळ दिला पाहिजे. सरकारने या एक महिन्यात आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा.

या एक महिन्यात हा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच एक महिन्यानंतर राज्यातील एकही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही असा थेट इशाराही जरांगे यांनी दिला आहे.