जेबीसीने फुलं टाकून शक्तीप्रदर्शन कशासाठी? मनोज जरांगे म्हणाले…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून सडकून टीकाही होत आहे. मराठा समाजाच्या गरिबीच्या मुद्द्यावर आरक्षणाची मागणी केली जाते, मात्र दुसरीकडे जेबीसीने फुलं टाकून स्वागत केलं जातं, शेकडो एकरवर सभा घेतली जाते यावर आक्षेप घेतला जातो. त्याबाबत मनोज जरांगेंना यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांचाही जोरदार समाचार घेतला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “हे शक्तीप्रदर्शन नाही. गोरगरिब मराठ्यांच्या लेकरांनी ६०-७० वर्षे आरक्षणाची वाट बघितली. इतकी वर्षे लढून मराठा समाजा आशा मावळल्या होत्या. आता कुठंतरी महाराष्ट्रात ३२ लाख लोकांना आज आरक्षण मिळालं आहे. सातत्याने कुणबी नोंदी सापडत आहेत आणि हे आरक्षण मिळणं चालूच आहे. त्यामुळे मराठा समाज खूप आनंदी आहे. घराघरातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचं कल्याण होत आहे.”

“मीही समाजालाच मायबाप मानलं आहे. त्यामुळे मीही समाजाचं लेकरू आहे. त्यामुळे समाजात उत्साह आहे आणि त्यातूनच ते स्वागत करत आहेत. त्यात काहीही वावगं नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं. “ज्या जेसीबीवरून तुमच्यावर सातत्याने टीका तो टाळत का नाही?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “मी स्वागतासाठी जेसीबी वापरू नका असं सांगतो आहे. मात्र, तो समाजाचा आनंद आहे. ३२ लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच भावनेतून ते जेसीबीने स्वागत करत आहेत.”, असंही ते म्हणाले.

टीका करणाऱ्यांची कितीही जळजळ झाली, तर आमचा समाज एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळे समाज जीव लावत आहे. ते इतरांच्या लेकरांसाठी लढतच नाहीत, त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लढतात. त्यामुळे त्याच्यावर लोक कसे फुलं टाकतील?”, असा सवाल करत त्यांनी टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केला.