मनोज जरांगेचं पुन्हा ‘आमरण उपोषणास्त्र’; मराठा आरक्षणाबाबत म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत भुमिका स्पष्ट करतांना ते म्हणाले की, आजपासून पुन्हा एकदा आपण आमरण उपोषण सुरू करत आहोत.

गेल्या २९ ऑगस्टला आमरण उपोषण सुरू झाले. यानंतर, १४ तारखेला तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देऊ, मात्र ते कायद्यात टिकायला हवे. यासाठी एक महिन्याची वेळ द्या. असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि आपले उपोषण सोडवले होते. सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, या गोर गरीब लेकरांसाठी आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीने कठोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत. कारण सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान सन्मान ठेऊन आपण त्यांना ३० ऐवजी ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, आमच्या गोर गरिबांच्या वेदना लक्षात घेऊन कुणाकडूनही अद्याप आरक्षण देण्यात आलेले नाही. आम्हाला कालपर्यंत आशा होती, की सरकार आम्हाला आमच्या हक्काचं, ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी आरक्षण मिळेल आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र तसे झाले नाही. यामुळे हे उपोषण पुन्हा सुरू केले आहे.

मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत. म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १६-१७ हून अधिक बांधवांनी आत्महत्या केल्या, मात्र संभाजीनगर वगळता, इतरांसाठी मद देण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललेले नाही. आमचा बांधव आमच्यातून गेला याला सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आमचा भाऊ आमच्यातून गेला नसता, असेही जरांगे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाविषयी काय म्हणाले ?
मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन केलं. मी कार्यक्रमात असल्याने पाहिलं नाही. आमचा दिवसरात्र कार्यक्रम सुरु आहे. मला बघायला वेळ मिळाला नाही. पण त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान ठेवला. आम्ही ४० दिवस दिले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा. कारण ते शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजात भावना झाली आहे. त्यांनी त्या शब्दाला जागावं. त्यांनी आता आरक्षण द्यावं. आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत.