Maratha Reservation : मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये घेणार जंगी सभा

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत

लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे.

सरकारनं सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंड शाही आणि दडपशी सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.

९०० एकरवर जंगी सभा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे.