मराठा आरक्षण ; सर्वपक्षीय बैठकीत एकमताने ठराव मंजूर

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थिती चिघळत असताना या मुद्द्यांवर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयक ठराव मांडण्यात आला. त्यावर बैठकीतील सर्व नेत्यांनी स्वाक्षरी केली. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन सर्वपक्षीय बैठकीतून नेत्यांनी केले.

काय आहे या ठरावामध्ये?

या बैठकीमध्ये ठरलेल्या मुद्द्यांवर आधारित एक संयुक्त ठराव तयार करण्यात आला असून त्यावर उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी सह्यादेखील केल्या आहेत. या ठरावामध्ये आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

“मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत आहे. यासाठीच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं. त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यत तो वेळ देणं गरजें आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्याच कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन करण्यात यते आहे. तसेच, या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे”, असा हा ठराव आहे.

या नेत्यांनी केली स्वाक्षरी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, जयंत पाटील(शेकाप), सुनील प्रभू, सुनील तटकरे, प्रशांत इंगळे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे, कपिल पाटील, राजू पाटील, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, रेखा ठाकूर, सुलेखा कुंभार, राजेंद्र गवई, गौतम सोनावणे, सचिन खरात, बाळकृष्ण लेंगरे, रवी राणा, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे या नेत्यांनी या ठरावावर सह्या केल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक : एकनाथ शिंदे

या बैठकीला उपस्थिती लावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, सरकारची बाजू समजून घ्या. सरकार कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर विचार करत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारला वेठीस धरणे योग्य नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या भागात जाऊन आपले कार्यकर्ते आणि जनतेची समजूत काढली पाहिजे, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.