जळगाव : जळगाव जिल्हयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २० वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुस्कान अल्ताफ तडवी (20) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील महेलखेडी येथे अल्ताफ रहमान तडवी व मुस्कान अल्ताफ तडवी (२०) हे दाम्पत्य वास्तव्याला होते. काही कामानिमित्त तडवी दाम्पत्य बाहेर गावी निघाले होते. दरम्यान, विरावली गावाजवळ पत्नी मुस्कान हीने पती अल्ताफला दुचाकी थांबवण्यास सांगितली. दुचाकी थांबवतास तिने धावत जात जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली.
पती अल्ताफ याने आरडाओरडा केली. नागरिकांनी धाव घेत, विवाहितेला तात्काळ विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखले केले. डॉक्टरांनी तपासणी अंती विवाहितेला मृत घोषित केले.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, अवघ्या २० वर्षीय विवाहितेने नेमकी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
घातपाताचा आरोप
दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.