मोदींच्या भाषणात पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधींचा विशेष उल्लेख; वाचा काय म्हणाले…

नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ५ दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाषण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून्या संसद सभागृहाबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा विशेष उल्लेख केला. पंडित नेहरू, शास्त्री यांच्यापासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली असं त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. नेहरूंच्या कारकिर्दीत वॉटर पॉलिसी बनवण्यासाठी योगदान दिले. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले. लाल बहादुर शास्त्री यांनी १९६५ च्या युद्धात जवानांचे मनोबल याच सभागृहातून वाढवले होते. हरितक्रांतीसाठी याच सभागृहातून पहिले पाऊल उचलले.

राजीव गांधी, इंदिरा गांधी यांना देशाने गमावले तेव्हा साश्रूनयनांनी श्रद्धांजली देताना याच सभागृहाने पाहिले. भारताच्या लोकशाहीत अनेक चढउतार पाहिले. हे सभागृह लोकशाहीची ताकद आहे. लोकशाहीचे केंद्रबिंदू हे सभागृह आहे. एका मताने याच सभागृहात सरकार कोसळले होते असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. संसदेच्या एकदा दहशतवादी हल्ला झाला, हा हल्ला संपूर्ण जगात एका इमारतीवर नव्हता, तर एक प्रकारे तो आपल्या आत्म्यावर हल्ला होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. पण आज ज्यांनी दहशतवाद्यांशी लढताना आपल्या सभागृहातील सदस्यांना वाचवण्यासाठी छातीवर गोळ्या झाडल्या त्यांनाही मी सलाम करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

याच संसदेत एका मतासाठी अटलजींचं सरकार पडलं होतं

“अनेक ऐतिहासिक आणि विलंबित प्रश्नही याच संसदेत घेण्यात आले. कलम ३७०, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी, वन रँक वन पेन्शन, गरीबांना १० टक्के आरक्षण असं निर्णय याच संसदेत घेतले. संसद लोकशाहीची ताकद आहे. जनविश्वासाचे केंद्रबिंदू राहिले आहे. याच संसदेत ४ खासदार असलेला पक्ष सत्तेत, तर १०० खासदार असलेला पक्ष विरोधात होता. याच संसदेत १ मतांनी अटल बिहारी वाजपेयी यांच सरकार पडलं होतं,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.