जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स ; राज ठाकरेंचा निशाणा

पनवेल : रस्ते खराब व्हायचे बंदच होणार नाहीत. हा एखादा रस्ता २५-३० वर्षासाठी चांगला केला तर पैसे खाणार कसे? हा धंदा आहे. रस्ते खराब झाले तर नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन टक्के हे सगळे सुरू आहे. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. आज पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही. राज्याकडून होत नसेल तर केंद्राने दखल घ्यावी असं मी नितीन गडकरींना सांगितले. पण ते म्हणाले मी लक्ष घातले पण ते कंत्राटदार पळून गेलेत. भाषणापुरता मर्यादित राहू नये. नाणारचा प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू पुढे आले. ५ हजार एकर जमीन कोणी विकत घेतली? चिरीमिरीसाठी कोकणी माणसं जमीन विकतायेत. कुंपणच शेत खातंय. आपल्याच लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात जमीन घालतायेत असा आरोपही राज यांनी केला.

२०२३ मध्ये गोव्यात कायदा केलाय, गोव्यातील शेतजमीन ती सहज कोणाला मिळणार नाही. शेतजमीन घ्यायची असेल तर तिथे शेतीच करावी लागेल. दुसरा धंदा करता येणार नाही असा कायदा आहे. तिथे भाजपाचे सरकार आहे. भाजपाचे मुख्यमंत्री असा कायदा करतायेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणातात, आम्ही गोव्याचे गुडगाव किंवा छत्तीसपूर होऊ देणार नाही. उत्तरेकडून येणाऱ्या लोकांना आम्ही गोव्यात जमीन देणार नाही असं ते सांगतात. परंतु इथे राज ठाकरे काय बोलला तर तो देशद्रोही होतो असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

कलम ३७० काढला, आधी जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येत नव्हती आता घेता येऊ शकते. जाऊन घ्या, तिथे मुकेश अंबानी, अदांनींना जमीन घेता येत नाही, आपलं सोडा. मिझोराम, हिमाचल प्रदेश तिथे जमीन घेता येत नाही. काही राज्यांना वेगळे कायदे असतात. महाराष्ट्रात सगळीकडून लोकं येतायेत आणि सगळ्या शहराची विल्हेवाट लागते. रस्ते बांधल्यानंतर जे पुढचे धोके आहेत त्याचा विचार करणार नाही का? शिवडी नाव्हाशेवा रस्ता सुरू झाला की रायगड जिल्ह्याचे काय होईल बघा, इतक्या बाहेरच्या लोकांनी तिथे जमीन घेतल्या आहेत. मूळ जमीन ज्याची त्याने विकली आणि तोच ज्याने जमीन घेतली त्याच्याकडे नोकरी करतोय असं म्हणत राज ठाकरे म्हणाले.