शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

मुंबई : राज्यात मान्सून कधी दाखल होईल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच हवामान विभागाने एक गुडन्यूज दिली आहे. ती म्हणजेचनैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून पोहोचल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती.मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

महाराष्ट्रात येत्या ३-४ तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.