Nandurbar News : १७ कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला, तुटला १२ गावांचा संपर्क

नंदूरबार : राज्यभरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकणी मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच तोरणमाळकडे (ता.धडगाव)   जाणारा रस्ता देखील पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. परिणामी तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा माध्यमातून तोरणमाळ, झापी, लेकडा ते राज्य सीमामार्गापर्यंत १७ कोटीं रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. शिवाय ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचा नागरिक करत आहेत. परिणामी यामुळे रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

१२ गावांचा संपर्क तुटला
पहिल्या पावसात रस्ता वाहून गेला आहे. तर काही भागात रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने तोरणमाळ परिसरातील १० ते १२ गावांच्या संपर्क देखील तुटलेला आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करत रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.