तुम्ही आमच्यावर जितकी चिखलफेक कराल, तितक्या जास्त ठिकाणी कमळ उमलेल

नवी दिल्ली : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर विरोधकांवर टिकास्त्र डागले. भारत हे संघराज्य आहे. गेल्या दशकामध्ये अनेक विचारवंतांनी घरी बसून देशाला दिशा दिली. असे लोकही घरात बसलेले असतात ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते देश ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. त्यामुळे तुम्ही आमच्यावर जितकी टीका किंवा चिखलफेक करायचा प्रयत्न कराल, तितक्या जास्त ठिकाणी कमळ उमलेल, अशा खरपूस शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला.

पीएम मोदी म्हणाले की काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी तक्रार करत होते की मोदीजी वारंवार माझ्या मतदारसंघात येतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पुन्हा पुन्हा तेथे येणारच, तुम्ही ते पाहिले असेलच. कारण तेथे १ कोटी ७० लाख जन धन बँक खाती उघडली गेली आहेत हे तुम्ही पाहायला हवे. एकट्या कलबुर्गीमध्ये ८ लाखांहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. मी काम करतोय हे पाहून विरोधकांना त्रास होतोय. मला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वेदना समजत आहेत. तुम्ही दलितांबद्दल जर बोलत असाल तर, त्याच ठिकाणी निवडणुकीत दलितांना विजय मिळाला हेही तुम्ही पाहायला हवे. आता जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे तुमचे रडगाणे गात आहात.