आनंदाची बातमी …मनपाच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता

तरुण भारत लाईव्ह  न्युज:   शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासनाची मान्यता मिळाली असून तब्बल मनपातील विविध ४५० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते त्याला यश मिळाले आहे.

जळगाव शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ठ असून सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेच्या मंजूर आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली नुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच जळगाव शहराची सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोक कल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरिकांकडून होणारी मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते. दरवर्षी कर्मचारी निवृत्त होतात. मात्र त्याजागी सक्षम कर्मचारी नेमला जात नसल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत होता. मोठ्या प्रमाणात कर भरूनही नागरिकांची कामे होत नसत. कर्मचारी भरण्याचा शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.
आनंदाची बातमी धडकली

जळगाव शहरासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज मंगळवारी धडकली. आ. सुरेश भोळे यांनी शहरातील जनतेला दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव महानगरपालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासन स्तरावर मान्यता मिळालेली असून जळगाव महानगरपालिकेत ४५० पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

१२ कर्मचार्‍यांना मिळणार न्याय

यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून आमदार भोळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. तसेच मनपातील शिक्षणाची अट असलेल्या १२ रोजंदारी कर्मचार्‍यांची सुद्धा सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावास सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे.
शासनाकडून ही मान्यता मिळाल्याने भविष्यात योग्य यंत्रणेमार्फत मनपात विविध पदांची भरती होईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निर्णय घेतले जावेत व जनतेची कामे पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

मनपाचा प्रलंबित अनुकंपा

भरतीचा मार्ग सुद्धा लवकरच पूर्ण होणार असून लेखापरीक्षण संदर्भातदेखील लवकरच योग्य तो निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय नगर विकास खात्याकडून मिळाल्याचे आ. भोळे यांनी कळविले आहे.

नवीन आकृतिबंध मंजुरी तसेच ४५० पदांच्या महत्वाच्या भरती प्रकियेमुळे जळगाव शहराच्या विकासाला गती येईल असा विश्वास दाखवत आ. भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.