“जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?”; नितेश राणेंनी जरांगे पाटलांना सुनावलं

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्यातच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसात्मक घटनांशी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन, जरांगे पाटील यांनी टीका केली. आता, जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर भाजपा आमदार नितेश राणेंनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांना सक्त इशारा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. मात्र, हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी बजावलं आहे. मात्र फडणवीसांवर जरांगे पाटलांनी टीका केली आहे. मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी ५ लाख येतील, अथवा १० लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करु द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

त्यानंतर, आमदार नितेश राणे यांनी ट्विट व्हिडिओच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे जरांगे पाटील आता राजकीय बोलू लागले आहेत. ज्या समाजकंटकांनी हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, लोकांची घरं जाळली, आमदारांची घरं पेटवली, तोडफोडो केली. त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्या भूमिकेचं समर्थन करण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. याचा असा अर्थ होतो का, जरांगे पाटील या हिंसेचं समर्थन करत आहेत, त्यांची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येत आहे? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला. तसेच, जर, असं होत असेल तर राज्य सरकार म्हणून याबाबत आम्हाला विचार करावाच लागेल, असेही त्यांनी जरांगे पाटील यांना सुनावलं आहे.