Video: पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न…

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोंदींना घेरण्याची रणनीती आखली आहे. या विषयावरुन विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मोदींनी सभागृहात निवेदन करण्यावर विरोधक ठाम आहेत. दरम्यान या ठरावावर आज लोकसभेत चर्चा होत असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न करण्यात आले आहेत.

अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत बोलणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ऐनवेळी काँग्रेस खासदार गौरव गोगोई अविश्वास ठरावावर बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे प्रमुख या नात्याने सभागृहात यावं आणि आपली भूमिका मांडावी. त्याला सर्व पक्षांनी समर्थन द्यावं आणि मणिपूरला संदेश जावा की हे सगळं सभागृह या कठीण प्रसंगी मणिपूरसोबत आहे. पण दुर्दैवाने असं झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केलं. ना लोकसभेत बोलणार, ना राज्यसभेत बोलणार. त्यामुळेच अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली. त्यांचं मौनव्रत आम्हाला तोडायचं आहे”, असं गौरव गोगोई यावेळी म्हणाले.

दरम्यान, विरोधकांनी मोदींना मणिपूरच्या मुद्द्यावरून तीन प्रश्न विचारले आहेत. 

१. पहिला प्रश्न – आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का नाही गेले? राहुल गांधी गेले, इंडिया अलायन्सचे वेगवेगळे पक्ष गेले. गृहमंत्री गेले. गृहराज्यमंत्री गेले. पण देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी का नाही गेले?

२. दुसरा प्रश्न – पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरवर बोलण्यासाठी जवळपास ८० दिवस का लागले? जेव्हा ते बोलले, तेव्हाही फक्त ३० सेकंद बोलले. त्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मणिपूरसाठी ना संवेदनशील भावना व्यक्त झाल्या ना शांतीचं आवाहन झालं. मंत्रीमंडळ बोलतंय की आम्ही बोलणार. तुम्ही बोला. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही. पण एक पंतप्रधान या नात्याने त्यांच्या शब्दाला जे महत्त्व आहे, ते इतर कुणाच्याही शब्दांना नाही. पंतप्रधान या नात्याने मोदींनी शांतीसाठी पावलं उचलली असती, तर त्यात जी ताकद आहे ती इतर कोणत्या खासदारामध्ये नाही.

३. तिसरा प्रश्न – पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून का नाही काढलं? तुम्हाला गुजरातमध्ये तुमचं राजकारण करायचं होतं तेव्हा तिथे एकदा नाही, दोनदा मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये निवडणुका आल्या तेव्हा एकदा नव्हे चार वेळा मुख्यमंत्री बदलले. त्रिपुरातही निवडणुकांआधी तुम्ही मुख्यमंत्री बदलले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही का एवढे आशीर्वाद देत आहात ज्यांनी स्वत: हे मान्य केलं आहे की त्यांच्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर झालं.