सरकारचा महत्वाचा निर्णय : खिचडी नव्हे, आता विद्यार्थ्यांना खायला मिळणार चमचमीत पदार्थ

मुंबई : खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चमचमीत पदार्थ खायला मिळणार आहेत. राज्यातील मुलांना सकस आणि पोषक आहार देऊन त्यांच्या प्रकृतीत आणि बौद्धिक क्षमतेत सुधारणा होण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात पौष्टिक आणि चमचमीत पदार्थ देण्यास सुरुवात केली जाणार आहे . शासनाच्या या निर्णयामुळे मुलांचा शाररिक आणि बौद्धिक विकास झपाट्याने होईलच शिवाय ग्रामीण भागातील मुलांचा शाळेकडे ओढा वाढण्यास देखील मदत होणार आहे.

राज्यात माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. मात्र शाळेत गेल्या वर्षानुवर्षे मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आत खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचे सत्व आणि पराठाही मिळणार आहे. तशी शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याचे स्वागत केले आहे.

केंद्र सरकारने स्थानिक उपलब्ध होणारे अन्नपदार्थ व तृणधान्य यांचा समावेश या आहारात करावा, असे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर, आरोग्य, आहार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती शालेय शिक्षण विभागाने नेमली होती. आता या निर्णयाचा बच्चे कंपनी बरोबर शिक्षक, माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या व्यक्ती आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडून जोरात स्वागत करण्यात आले आहे.

या समितीने शिफारसी देताना सोयाबीन तेलाऐवजी सूर्यफुल तेलाचा वापर करावा.  आठवडाभर एकच खाद्यवस्तू देण्याऐवजी दर दोन दिवसांनी आहार बदलावा. या आहारात  उडीद-तांदळाची इडली, रवा इडली, केशरी रवा इडली असे विविध प्रकार असावेत. शिवाय मल्टिग्रेन पराठ्यामध्ये चार प्रकारचे धान्य असावे सोबत पुदिना चटणी द्यावी असे बदल सुचविताना माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करावी, असेही समितीने सुचविले आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत लाखोंच्या संख्येने गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अशा मुलांना आहारात हवे तेवढे प्रोटीन व इतर घटक परिस्थितीमुळे नियमित मिळत नसल्याने या निर्णयाचा खरा फायदा या लाखो गोरगरीब लहान मुलांना होणार आहे.

या मुलांना द्यायचे खाद्यपदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडीओ समितीचे एक सदस्य आणि शेफ विष्णू मनोहर स्वत: तयार करणार आहेत. ते सर्व शाळांकडे पाठवून त्यानुसार खाद्यान्य तयार केले जातील. या शालेय पोषण आहारात बेदाणे देण्याबाबत देखील निर्णय झाल्याने याचा फायदा हजारो बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सध्या द्राक्षाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्याने बेदाणे प्रक्रिया उद्योग सुरु केला मात्र बेदाण्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते . शासनाने आता पोषण आहारात बेदाणा देखील देण्याबाबत निर्णय घेतल्याने या बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकणार असल्याचे बेदाणा उत्पादक प्रश्न देशमुख यांनी सांगितले.