---Advertisement---

दुर्दैवी ! सुकी नदीत मासेमारीसाठी गेले अन् घडला अनर्थ, बिकरमसोबत नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

जळगाव : मासेमारीसाठी सुकी नदीवर गेलेल्या ४६ वर्षीय मासे माराचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रावेरच्या पाल येथे शुक्रवारी उघडकीस आली. बिकरम केकड्या भिलाला (वय ४६, रा. पाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

---Advertisement---

बिकरम भिलाला हे गुरुवारी घरून सकाळी मासेमारीसाठी सुकी नदीकाठी गेले; मात्र संध्याकाळपर्यंत न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान नदीकाठी त्यांचे कपडे, बूट, मासेमारीचे जाळे आणि साहित्य आढळून आल्याने त्यांच्यासोबत काही अनर्थ घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शोधमोहीम रात्रभर सुरू होती. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीत तरंगतांना आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पाल पोलीस चौकीचे पोलीस हवालदार जगदीश पाटील आणि कोतवाल अम तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे पाल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुटुंबावर मोठे आर्थिक संकट

बिकरम भिलाला हे सालदारी करून आपल्या वयोवृद्ध आई-वडील आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्याच उत्पन्नावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असल्याने अचानक घरातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---