Dhule News: राज्यात कांदा प्रश्न चिघळला; धुळ्यात “उबाठा” गट रस्त्यावर

Dhule News: कांद्यावरील निर्यात शुल्कात ४० टक्क्यांनी वाढ केल्यानंतर राज्यात कांदा प्रश्न चिघळला आहे. सर्व स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान ठाकरे गटाने याप्रश्नी थेट इशाराच दिला आहे.

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एप्रिल ते जुलै महिन्याच्या कालावधीत ५० टक्के पेक्षा अधिक कांदा सडल्याने उकीरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ८०० ते १ हजार रूपयांपेक्षा अधिक भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. केंद्र सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या निर्णयाला केंद्र शासनाने त्वरीत स्थगिती द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

तसेच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखावे असे न झाल्यास धुळ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदा फेक आंदोलन करू, असा गंभीर इशारा माजी आमदार शरद पाटील यांनी यावेळी दिला.