महाराष्ट्राच्या समृद्धीचा २ टप्पा होणार खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नागपूर – शिर्डी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. आता २६ मे रोजी शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंतचा मार्ग खुला होणार आहे.

मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून येत्या शुक्रवारी २६ मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे.

शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात १२ बोगदे आणि १६ छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.