मोठी बातमी : मुंबईत घातपाताची शक्यता!

मुंबई : मुंबईमध्ये २८ मे ते ११ जून २०२३ या कालावधी पर्यंत अचानक पणे कडक निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. मुंंबई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन हा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे. मुंबईत शांतता बिघडविण्याचा प्रयत्न होवू शकतो, अशी गोपनिय माहिती मिळाली असल्याने मुंबई पोलिसांनी अचानक हा निर्णय घेतला आहे.

पोलिसांच्या आदेश पत्रात म्हटलं आहे की, मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसंच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडवण्याची शक्यता गुप्त खबर्‍यांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, लग्न समारंभ, शोकसमारंभ, कोऑपरेटिव्ह सोसायट्या-संस्थाचे कार्यक्रम, चित्रपटगृह – नाट्यगृह, दुकाने, व्यवसायाची ठिकाणं यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावे असं जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे. ११ जूनपर्यंत शहरात हा आदेश लागू राहणार आहे. मुंबई शहरातील शांतता टिकून राहणे, मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू या हेतूने हा आदेश जारी करण्यात आल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्याची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.