प्रकाश आंबेडकर – उध्दव ठाकरे गटात बिनसले; युतीतुटीची घोषणा!

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच केली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत थेट शब्दांत भाष्य केले आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती आता राहिली आहे, असे मी म्हणणार नाही. याचे कारण म्हणजे आता वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग होण्याच्या प्रयत्नात आहे. चार पक्षांची चर्चा सुरू आहे. आधी फक्त ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली होती. ते आता राहिलेले नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही.

पण, वंचितने महाविकास आघाडीत जायचे असेल, तर आधी आपण बसून चर्चा केली पाहिजे, असे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. धोरण ठरवले पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे. मग आपण तिकडे जायचे ठरवू. त्यातील काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. काही लोक त्यांच्याशी बोलून आले. पण काही झाले नाही. त्यामुळे आता युती नाही. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाही तर युती नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.

यावर भाष्य करतांना राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तुटल्याची घोषणा केली. हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती, तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.