विधि विद्यापीठाच्या कुलगुरुंचा मुदतपूर्व राजीनामा

छत्रपती संभाजीनगर : ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधीविद्यापीठ’चे (एमएनएलयू) कुलगुरू डॉ. कोल्लुरूव्यंकटा सोमनाचा सरमा यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला आहे. पहिले कुलगुरू प्रो. एस. सूर्यप्रकाश यांच्या नंतर डॉ. सरमा यांनीही कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू का टिकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर विद्यापीठासंदर्भात सरकारचे दुर्लक्ष, निधीसह इतर बाबींसाठी करावा लागणारा संघर्ष यांमुळे कुलगुरू राजीनामा देत नाहीत ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सरमा यांनी ऑगस्टमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२४ मध्ये संपत आहे. परंतु त्यापूर्वीच त्यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते नलसार राष्ट्रीय विधी विद्यापीठात मुळपदावर कार्यरत झाले आहेत. डॉ. सरमा यांच्याआधी तत्कालीन कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांनीही कुलगुरूपदाचा दीड वर्षे कार्यकाळ बाकी असताना राजीनामा दिला होता. त्या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराबाबत नाराजी ही व्यक्त केली होती. आता डॉ. सरमा यांच्या मुदतपूर्व राजीनाम्याने विद्यापीठ चर्चेत आले आहे. आता डॉ. सरमा यांच्यानंतर विद्यापीठातील प्रो. ए. लक्ष्मीनाथ यांच्याकडे प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रो. लक्ष्मीनाथ हे विशाखापट्टनम(ए.पी.) डी. एस. राष्ट्रीय विधी विद्यापीठात कुलपती, चाणक्य नॅशनल लॉ विद्यापीठात कुलगुरूयासह अनेक विद्यापीठांमध्ये विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

राज्य सरकारचे दुर्लक्ष

राज्य सरकारचे राष्ट्रीय विधी विद्यापीठाकडे उभारणीपासून दुर्लक्ष आहे. पुरेसा निधी, पदभरतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा प्रकार समोर आले. विद्यापीठाला दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणाच्या कामासाठी सुमारे १०० कोटी रुपये स्वबळावर उभे करण्याविषयी पत्राद्वारे राज्य सरकारने कळवले होते. मराठवाड्यासारख्या मागास भागात स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ उभारणीला निधी उभारणीबाबतचे पत्र आल्यानंतर त्यावरून विधी क्षेत्रातून नाराजी व्यक्त झाली.

सरमा यांच्या काळात अनेक बदल

डॉ. सरमा यांच्या कार्यकाळात विद्यापीठात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. विद्यापीठात पहिल्या टप्प्यात सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून इमारतींची उभारणी करण्यात आली. यामध्ये अद्ययावत ७० क्लास रूम, विविध सदनिका, सेंटर ऑफ एक्सलेंस इमारत व मुला-मुलींचे वसतिगृहबांधकाम पुर्ण झाले. अद्ययावत ग्रंथालय, एक हजार विद्यार्थ्यांसाठीची खानावळ सुरू झाली. आजघडीला विद्यापीठात बीए एलएलबी (ऑनर्स), बीबीए एलएलबी (ऑनर्स), एमएलएम, पीएचडी व एलएलडी अभ्यासक्रमासह बीबीए-एमबीए एकात्मिक अभ्यासक्रम. एमबीए-लॉ अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट, एमबीए-लॉ ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड फायनान्शिअल टेक्नॉलॉजी, एमबीए – कोर्ट अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, एमए-फॉरेन्सिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एलएलएम-आर्टिफिशीयल इंटिलेजेंस अँड सायबर सेक्युरिटी, एमए-पब्लिक पॉलिसी आदी अभ्यासक्रम सुरू आहेत.

मी व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिला आहे. कार्यकाळात अनेक चांगल्या सोयीसुविधा निर्माण केल्या याचे समाधान आहे. अद्ययावत क्लास रूम, ग्रंथालय आदींचा समावेश आहे. यासह नवीनअभ्यासक्रमही सुरू केले.

-डॉ. सरमा, माजी कुलगुरू, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपतीसंभाजीनगर