राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; वाचा काय आहे प्रकरण

अहमदाबाद : राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने सकाळी ११ वाजता आपला निर्णय दिला आहे.

राहुल गांधी आज या कोर्टात पोहोचले होते. यावेळी कोर्टाने राहुल गांधींना तुम्हाला यावर काही सांगायचे आहे का असे विचारले. यावेळी राहुल यांनी मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे सांगितले. सुरतच्या जिल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम ५०४ अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम ५०४ मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल यांना लगेचच जामिनही दिला आहे.