Ind vs Eng Semi Final : भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास काय होणार ?

T20 World Cup 2024 :  उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळवला जाणार आहे. हा सामना गयानामधील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता हा सामना सुरू होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाची शक्यता आहे. परंतु ,  फक्त पाऊस सतत पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला नाही.

पाऊस पडला तर काय होणार ?
टी-ट्वेन्टी वर्ल्डचा पहिला सेमीफायनलचा सामना आज सकाळीच पार पडला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने अतिशय सहजपणे जिंकत थेट फायनलमध्ये मजल मारली आहे. या सामन्यात पाऊस पडला तर या सामन्यासाठी एक विशेष रिजर्व डे ठेवण्यात आला होता. पण दुसऱ्या सेमीफायनलसाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही.

विशेष म्हणजे दुसरा सेमीफायनलचा सामना हा दोन बलाढ्य संघांमध्ये आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी करो या मरोच्या धर्तीवर असणार आहे. असं असलं तरी आयसीसीने पाऊस पडला तर या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच पाऊस पडला तर ओव्हर कमी करण्याचा नियम देखील घेण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यातील सेमीफायनलच्या सामन्यासाठी टॉस उडवण्याआधी पाऊस पडला तर सामना सुरु होण्यास वेळ लागू शकतो. या सामन्यासाठी रिजर्व डे नाही. विशेष म्हणजे सेमीफायन आणि फायनल सामन्याच्या दरम्यान केवळ एका दिवसाचा गॅप आहे. याचमुळे या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही.

या सेमीफायनलसाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. पण पाऊस आला आणि थांबलाच नाही तर रात्री 12.10 वाजेपासून ओव्हरची संख्या कमी करण्याचा निर्णय होईल. तरीही किमान पाच षटकांचा खेळ झाला नाही तर गटामध्ये अव्वल स्थान भारताने मिळवलेले असल्यामुळे त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळेल.