राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड

मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आता न्यायालयाने त्यांचाविरोधातील अटक वॉरंट रद्द केला असून त्यांना ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

२००८ साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता.