राज ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला ; वाचा काय म्हणाले…

पुणे : अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जाताना टोल नाक्यावर अडवल्याने मोठा वाद झाला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोडही केली. याबाबत विचारले असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या सारखं दुर्देव नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी गडकरी यांचे नाव न घेता टीका केली.

राज ठाकरे म्हणाले की, अमित महाराष्ट्रभर दौरा करतोय आणि तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. त्या गाडीवर फास्टटॅग होता, त्यानंतरही थांबवून ठेवलं होतं. त्यावेळी तो समोरचा माणूस उद्धट बोलला. त्यावर आलेली ती रिअॅक्शन होती. तसंच अमितवर होत असलेले आरोप हे तो राजकारणात येत असल्याने होतायत आणि आरोप, टीका होतच राहणार असंही राज ठाकरे म्हणाले.

भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं? प्रत्येकवेळी टोलचा ठेका म्हैसकर नावाच्या व्यक्तीला मिळतात. हे मिळतात कसे, कोण आहे हा, कोणाचा लाडका आहे हा. टोलची प्रकरण काय आहे? मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रमाणे समृद्धीवर फेन्सिंग कधी लावणार? जनावर आडवी येतात, माणसं मरतात. त्यापूर्वीच टोल लावला आहे. रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत. फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. मग तरीही आपण टोल का भरतोय अशा शब्दात संताप व्यक्त केला.