Bengaluru stampede case : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर आरसीबीने ४ जून रोजी बंगळुरूमध्ये विजय साजरा केला.दरम्यान, प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरसीबी मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड (आरसीएसएल) विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे. यामुळे आरसीबीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आरसीबीचा म्हणणं आहे की, या प्रकरणात त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फ्रँचायझीने या समारंभाबद्दलच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले होते की प्रवेश पास मोफत असला तरी त्यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. याशिवाय, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) द्वारे आयोजित या समारंभाचे व्यवस्थापन करणारी कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कनेही त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांचा युक्तिवाद असा आहे की, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पुरेसे पोलिस बळ तैनात नव्हते, ज्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. या प्रकरणात, बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कचे इव्हेंट मॅनेजर आणि केएससीए व्यवस्थापन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा युक्तिवाद काय ?
गुन्हा दाखल झाल्यानंतर, प्रकरण सीआयडीकडे पाठवण्यात आले आहे, जे या प्रकरणाची चौकशी करत आहे. याशिवाय, आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसाळे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे, तर उच्च न्यायालयाने सध्या पोलिसांना केएससीए अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यापासून रोखले आहे.
या प्रकरणात, बेंगळुरू पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांचे अधिकारी ४ जून रोजी सकाळी ५:३० वाजेपर्यंत स्टेडियमभोवती ड्युटीवर होते. या दरम्यान, कर्नाटक विधानसभेत आरसीबीच्या विजयानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम होऊ दिला नाही.