नवा ट्विस्ट : प्रकाश आंबेडकर म्हणतात, तर मी भाजपसोबत युती करण्यास तयार

लातूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबतच्या नव्या संसाराची घोषणा केली. पण त्यांनी वंचितसोबतच्या युतीसाठी आपले राजकीय दरवाजे मोकळे ठेवले आहेत. भाजपसोबत युती करण्यास तयार आहे असं सांगताना त्यांनी त्यासाठी भाजपला एक अट घातली आहे. भाजप जर मनुस्मृतीचा त्याग करत असेल तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार आहोत. भारतात कोणीही कुणाचा शत्रू नाही. सर्वच भारतीय आहेत. फार फार तर टोकाचे मतभेद असू शकतात. पण भाजपने आमची अट मान्य केली तर भाजपसोबतही आम्ही युती करु शकतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते लातूरमध्ये बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, राजकारणात कोणताही पक्ष कुणाचाही कायमस्वरुपी दुश्मन नाही. भारतीयांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण दुश्मनी असू शकत नाही. आरएसएस आणि भाजपशी आमचे टोकाचे मतभेद आहेत. मी अनेकवेळा जाहीर मंचावरुन ते मांडलेही आहेत. पण भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष जर मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत घरोबा करु शकतो

मनृस्मृती सोडायची म्हणजे काय करायचं? महाडला बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी मनुस्मृती जाळली होती, तेच मोहन भागवत यांनी नागपूरला करावं. मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यात भाजप, संघ बदल करणार असेल. तर त्याचं स्वागत करू, असंही आंबेडकर म्हणाले.