शेतकर्‍यांसाठी आर आर आबांच्या मुलाने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

नागपूर : फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांवर आलेल्या संकटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महत्त्वाची मागणी केली आहे. रोहित पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. कृत्रिम प्लास्टिक फुलांमुळे पर्यावरणाची हानी होत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने शेतकर्‍यांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर रोहित पाटील यांनी प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सरकारच्या वतीने प्लास्टिकचा वापर कमी करण्यासोबत त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र पूर्णपणे बंदी आणून देखील सर्सासपणे प्लास्टिकच्या उत्पादनांचा वापर केला जात आहे. अशातच शेतकर्‍यांनाही प्लास्टिक फुलांच्या पर्यायामुळे मोठा फटका बसला आहे. गेल्या काही काळांपासून अल्पदरात प्लास्टिकची फुले उपलब्ध होत असल्याने फूलशेती करणार्‍या शेतकर्‍यांवर मोठं संकट आलं आहे. याबाबत आता रोहित पाटील यांनी आक्रमक होत थेट यावर बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालून शेतकरी जे फुल पिकवत आहेत त्याला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली. यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले असून मतदारसंघातील व राज्यातील फुल उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे रोहित पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CmtRWBcAynV/?utm_source=ig_web_copy_link