संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान; वाचा काय म्हणाले

मुंबई : सेना भवन शिंदे गट ताब्यात घेणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका नेत्याने केल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटामध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे दिसत आहे. यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. पक्ष शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालये आमची, पक्ष आमचा, नेता आमचा, मग तुम्ही काय केले? हिंमत असेल तर स्वत:चे अस्तित्व निर्माण करा. स्वतः च्या मुलांना जन्म द्या दुसर्‍यांची मुले खेळवू नका, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होते आहे? तेथील सरकार कानडी संघटना मराठी भाषा मराठी माणसावर अन्याय करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश पाळले जात नाहीत. हा प्रदेश केंद्राशासित करावा, तेथील मराठी लोकांनवरील अन्याय थांबावा, त्यासाठी ही त्यासाठी मागणी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, कर्नाटक सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईमध्ये देशातील सर्व प्रांतातील लोक येऊन राहत आहेत. कानडी बांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. आमचा कानडी लोकांना विरोध आहे का? नाही. मग मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का केली जात आहे? अशी मागणी करणारे मूर्ख आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.