राऊतांविषयी बोलताना सत्तारांची जीभ घसरली, म्हणाले…

Maharashtra Politics : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचं राजकीय वर्तुळ चांगला तापलं आहे. दोन्ही गटातील नेते रोजच एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. अशातच संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेवर बोलताना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.

काय म्हणाले सत्तार?
संजय राऊत रोज सकाळी उठतो आणि आमच्यावर भुंकतो. त्याची अवस्था कुत्र्यासारखी झाली आहे. असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतात. आमचं सुद्धा ४०-४२ वर्षांचं राजकारण आहे. ज्या कुत्र्याला आम्ही मतदान करून राज्यभेवर पाठवलं आणि तो आम्हालाच कुत्रा बोलत असेल, तर त्याच्यासारखा महाकुत्रा कुणीही नाही, अशा खालच्या भाषेत टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले, “तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावं. मी सुद्धा राजीनामा देतो त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. त्या वेळस तो कुणाची अवलाद आणि कसा आहे हे कळेल तुम्हाला”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत नुकत्याच झालेल्या राजीनामानाट्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’मध्ये ‘पवार पुन्हा आले! भाजपचे लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच’ अशा शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला होता. या अग्रलेखातून राऊतांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

‘शिवसेना सोडून जे गेले, त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळं भाजपच्या खाणाखुणांना भुलून पक्ष सोडणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. जे जातील, त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो, अशी टीका शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.