धुळ्यातील पत्रकार परिषदेत काय म्हणाले आ.सत्यजीत तांबे?

धुळे : आज घरोघरी डॉक्टर, इंजिनिअर, वकील आहेत. परंतु त्यांना रोजगार नाही. त्यामुळे प्रामुख्याने रोजगारासह शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे, अशी माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी आज शुक्रवारी साक्री रोडवरील पत्रकार संघाच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तसेच आज मुंबई-दिल्ली कॅरीडॉर, महामार्ग, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग अशी विकासाची कामे होत आहेत. त्याचा वापर करून नाशिक, धुळे, नंदुरबार-जळगावपर्यंत उद्योग, व्यापार पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. याबरोबरच स्थानिक लोकप्रतिधीची भेट घेवून चर्चा करून रोजगाराचा प्रश्न कसा सोडविता येईल, स्थानिकाला त्याच ठिकाणी कसा रोजगार मिळले, यासाठी प्रयत्न राहतील. विधान परिषदेच्या अधिवेशात पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही आ. तांबे यांनी यावेळी सांगितले. तसेच आधी विभागात लाखोंच्या संख्येने पदवीधर आहेत. आधी स्थानिक प्रश्न समजुन घेणार असून ते शासन दरबारी मांडून सोडविण्याचे काम केले जाईल. विधानपरिषदेच्या अधिवेशात देखील हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद!

शिक्षण क्षेत्रातील सर्वच प्रश्न सोडविण्यासाठी तीन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात येणार आहे. त्यात पुढील 25 वर्षाच्या शिक्षणाचा रोड मांडण्यात येईल. तसेच नुकतीच नाशिक येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालयाला भेट दिली असून विभागात उद्योग, व्यापार कसा वाढविता येईल, याबाबत एक दिवसीय कार्यशाळा नाशिक येथे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जुनी पेन्शन, विना अनुदानीत शिक्षण संस्था, विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षक भरती, जि.प.शाळेेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन असे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केले जातील. खरे तर शिक्षक आणि आरोग्य या दोन विभागासाठी शासनाने पैशांचा विचार करू नये, मदत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षात राज्यात पाहीजे तसे उद्योग आलेच नाही

महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योग गुजरातमध्ये गेले. पंरतू ते थांबविण्यासाठी किंवा परत येण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसून आले नाही. विलासराव देशमुख यांच्या सरकारनंतर गेल्या दहा वर्षात राज्यात पाहिजे तसेच उद्योग, व्यवसाय आले नाहीत. नवीन प्रकल्प यावेत यासाठी सरकारची तशी मानसिकता देखील दिसून आली नाही. फॉक्सकॉन, वेंदांता सारखे उद्योग व त्याला लागून इतर लहान व्यवसाय आल्याशिवाय रोजगाराच प्रश्न सुटणार नाही. तसेच लघु उद्योगांकडे बघणे देखील काळाजी गरज आहे. त्यामुळे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.