केदारनाथ : येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचे हेलिकॉप्टर भरकटून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (१५ जून ) रोजी सकाळी गौरीकुंड जंगलात घडली. या अपघातात यवतमाळ येथील जैस्वाल कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे.
आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर देहरादूनहून केदारनाथ धामला निघाले होते. दरम्यान, गौरीकुंड जंगलात दाट धुके आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर भरकटले. यानंतर त्याचा संपर्क तुटला आणि ते गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. खराब हवामान हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे, अशी माहिती उत्तराखंडचे एडीजी डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिली.
चौकशीचे आदेश
उत्तराखंड प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडासह हवामानाच्या परिस्थितीचा तपास केला जाणार आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत आणि सहकार्य देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने भाविकांना सतर्क राहण्याचे आणि हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.