देवेंद्र फडवीसांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचे मोठे विधान; वाचा काय म्हणाले

जळगाव : राष्ट्रवादीच्या जळगाव येथे होत असलेल्या स्वाभिमान सभेआधी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, ओबीसी समाजाचा आताचा आरक्षणाचा जो कोटा आहे, त्यामध्ये आणखी वाटेकरी करणं, हे समाजासाठी अन्यायकारक आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही तिखट भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले की, फडणवीसांनी माफी मागितली ना. म्हणजे लाठीहल्ला कोणी केला, काय केलं, याबाबत थोडीतरी स्पष्टता आली आहे. बाकी फडणवीसांनी राजीनामा द्यावा की नाही, याचं उत्तर सरकारने द्यावे. देवेंद्र फडणवीस ज्या गोवारी प्रकरणाचा दाखला देतात त्यात तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड व मुंबईतील एका घटनेत आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीची दोन उदाहरणं बघितली तर मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आता त्यामधून कोणी काही प्रेरणा घेतली तर राजीनाम्याबाबत विचार करता येईल, असे सूचक भाष्य शरद पवार यांनी केले.

जालन्यात मराठा मोर्चावर लाठीमार करण्याचे आदेश आमच्याकडून देण्यात आल्याचे सिद्ध झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, तिघेही राजकारणातून संन्यास घेऊ. मात्र, हे आरोप सिद्ध करता आले नाहीत तर विरोधकांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यावर भाष्य करतांना शरद पवार म्हणाले की, तिथे लाठीहल्ला झाला. या घटनेचे जे काही व्हिडिओ दाखवले जात आहेत, त्यामध्ये पोलीस लाठीहल्ला करताना दिसत आहेत. आता तो लाठीहल्ला करण्याच्या सूचना कोणी दिल्या, का दिल्या, त्याची गरज होती का, या सगळ्याचे स्पष्टीकरण सरकारनेच द्यावे. कारण यंत्रणा तुमच्या हातात आहेत, आमच्या हातात नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले.