शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र का आली?

मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा सोमवारी रोजी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठे बदल दिसतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांसोबत आता वंचित बहुजन आघाडी या चौथ्या महत्त्वाच्या पक्षाचा समावेश झालाय. विशेष, एकत्र का आलो? याची संयुक्त भूमिका प्रकाश आंबेडकर तसेच ठाकरे यांनी मांडली.

एकत्र का आलो?
सध्याच्या राजकारणातील वाईट आणि परंपरा, चाली सुरू झाल्या आहेत. त्यावर आघात करून मोडून, तोडून टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत. प्रथम देशहित महत्त्वाचं असतं. कारण एक भ्रम पसरवला जातोय. नेहमी हुकूमशाहीकडे वाटचाल ही अशीच होते. जनतेला भ्रमात ठेवायचं. नको त्या वादात आडकवून ठेवायचं आणि आपलं इप्सित साध्य करायचं असं चाललंय. या वैचारीक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी आणि देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, आणि घटनेचं महत्त्व आणि त्याचं पावित्र आबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीसोबतची युतीची घोषणा केली.