धक्कादायक! उकळत्या तेलाच्या कढईत पडून सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३। नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सटाणा तालुक्यात असलेल्या लखमापूर येथील सहा वर्षीय चिमुरडीचा उकळत्या तेलाच्या कढईत पडून भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चिमुकलीची मृत्यूसोबत सुरू असलेली अनेक दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहराजवळील लखमापूर येथील चिमुरडी कुटुंबासमवेत राहत होती. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरी स्वयंपाक करण्याचे काम सुरु होते. याच वेळी मोठ्या कढईत शेव काढण्याचे कामही सुरू होते. चिमुरडी उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने लखमापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखमापूर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मात्र उपचार सुरु असताना १३ मार्च रोजी तिचे निधन झाले. तब्बल वीस दिवसांची तिची झुंज अयशस्वी ठरली. सहा वर्षाच्या चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.