…म्हणून रस्त्यावरच्या नमाजला विरोध!

आता लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य करणार्या महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा केली जावी, अशी मागणीही धर्मांध मुस्लिमांकडून केली जात आहे. खरे म्हणजे, अशी मागणी करणाऱ्यांना गरबा नृत्य व नमाजमध्ये समानता दिसली, हीच हास्यास्पद बाब. कारण, गरबा नृत्य म्हणजे हिंदू धार्मिक विधी नव्हे, पण नमाज मात्र मुस्लिमांचा अत्यावश्यक धार्मिक विधी आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या आनंदात संपूर्ण भारतासह जगभरातील हिंदू न्हाऊन निघत आहेत. अनेक देशांत, अनेक धर्मांत स्त्रीयांवर शेकडो बंधने असताना, त्यावरून कुठे आंदोलन तर कुठे हिंसाचार सुरू असताना, स्त्रीशक्तीला देवी भगवतीचे स्वरुप मानून साजरा होणारा नवरात्रोत्सव हिंदू धर्माने मानवतेला दिलेली देणगीच. स्त्रीला अबला समजून तिला जाचक धार्मिक कायद्यांत अडकवून तिचे शोषण करणाऱ्या समोर ‘दैत्यविनाशिनी’ म्हणून नवरात्र व नंतरच्या विजयादशमीला पूजणाराही हिंदू धर्मच.

याच नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचे पूजन करताना हिंदू धर्मीय ठिकठिकाणी दांडिया, गरबा नृत्याचेही आयोजन करतात. हजारो वर्षांपासून साजऱ्या केल्या जाणाऱ्या दांडिया, गरबा नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीही पिढ्यान्पिढ्या जोपासली जाते. म्हणूनच आजच्या काळातील तरुण-तरुणीही दांडिया, गरबा नृत्यात मोठ्या आवडीने सहभागी होताना दिसतात. इतकेच नव्हे, तर नवरात्रोत्सवाचा आनंदच इतका असतो की, अनेकदा वेळ आणि सवंगडी जमले की दांडिया, गरबा नृत्य हव्या त्या ठिकाणीही सुरू होते. ते त्यात सहभागी होणार्यांसह आजूबाजूच्यांनाही एक वेगळीच अनुभूती देते.

पण, त्यावरुनही खुसपट काढणारे, त्याला विरोध करणारे, विघ्नसंतोषी लोक असतातच आणि झालेही तसेच. घटना मुंबईतील असून त्यावर समाजमाध्यमांतून धर्मांध मुस्लिमांकडून टीका करण्यात येत आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये हिंदू महिलांनी शानदार गरबा नृत्य केले. त्याची चित्रफित समाजमाध्यमांवर वेगाने ‘व्हायरल’ होत आहे. त्यावर समाजमाध्यमी वापरकर्त्यांकडून लाईक अन् कमेंट्सचा पाऊस पडत असून गरबा नृत्याचे कौतुक केले जात आहे. अर्थात, आपल्या देशाचा प्राण या संस्कृतीतच आहे, ही संस्कृतीच दररोजच्या जगण्यात आपल्याला पुढे घेऊन जात असते, आपल्या जगण्याला प्रेरणा देत असते, ती सर्वांना आवडणारच!

मात्र, स्वतःला ‘भारतीय’ म्हणवून घेत असले तरी आपल्या देशाच्या संस्कृतीशी एकरुप न झालेले डावे, समाजवादी आणि धर्मांध मुस्लिमांचे टोळके सतत या संस्कृतीला, या संस्कृतीतल्या सण-उत्सवांना विरोध करण्याचे काम करत असते. त्यातही मुस्लिमांकडून नेहमीच ‘गंगा-जमुनी तहजीब’चा उल्लेख करुन आपणही या देशाच्या सामाजिकतेत, धार्मिकतेत समरस झाल्याचे दावे केले जातात. पण, ते खरेच तसे असतात का? की फक्त स्वतःचेकाम भागवण्यासाठी तसे म्हटले जाते? आताच्या लोकल रेल्वेमधील हिंदू महिलांच्या गरबा नृत्याला धर्मांध मुस्लिमांकडून होत असलेल्या विरोधाने तर त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची पुरती पोलखोल झाल्याचेच दिसते.

यातला एक निराशाजनक मुद्दा म्हणजे, गरबा नृत्यही सहन न होणाऱ्या धर्मांध मुस्लिमांच्या सणावारांना पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, उदारमतवादाचे खूळ संचारलेल्या हिंदूंकडूनच मंदिरांत वगैरे साजरे केले जाते वा इफ्तार पार्ट्याही दिल्या जातात. ते सर्व बंद झाले पाहिजे, असे नाही पण मग पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, उदारमतवादाचा आरडाओरडा करणार्यांकडून कधी मशिदीत हिंदू सणवार का साजरे केले जात नाहीत? किंवा त्या विचारांचे आहोत असे म्हणणारे मुस्लीमही कधी त्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? उलट तसे न होता आता लोकल रेल्वेमध्ये हिंदू महिलांनी गरबा नृत्य केले तर त्याची तुलना थेट दर शुक्रवारी वाहतूक अडवून, इतरांना त्रास देणार्या रस्त्यावर पढल्या जाणार्या नमाजशी करण्यापर्यंत धर्मांध मुस्लिमांची मजल गेली.

हिंदू महिलांनी लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य केले, तर त्यांना कोणीही अटक केली नाही, त्यांना कोणीही ‘धर्मांध’ म्हटले नाही, त्यांना कोणीही ‘जिहादी’ म्हटले नाही, त्यांना कोणीही ‘दहशतवादी’ म्हटले नाही, मग आम्हीच रस्त्यावर वा मॉलमध्ये वा रुग्णालयात वा विमानतळावर वा मोकळ्या सार्वजनिक जागेवर नमाज पढली तरच आम्हाला का विरोध केला जातो, असा सवाल धर्मांध मुस्लिमांकडून विचारला जात आहे.

तसेच, आता लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा केली जावी, अशी मागणीही धर्मांध मुस्लिमांकडून केली जात आहे. खरे म्हणजे, अशी मागणी करणार्यांना गरबा नृत्य व नमाजमध्ये समानता दिसली, हीच हास्यास्पद बाब. कारण, गरबा नृत्य म्हणजे हिंदू धार्मिक विधी नव्हे, पण नमाज मात्र मुस्लिमांचा अत्यावश्यक धार्मिक विधी आहे. संबंधित महिला लोकल रेल्वेमध्ये पूजा-पाठ, होम-हवन काहीही करत नव्हत्या, तर त्या फक्त गरबा नृत्य करत होत्या. त्यात लोकल रेल्वेमधील अन्य प्रवासीदेखील तल्लीन झाल्याचे, त्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचे, त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसते.

तिथल्या कोणालाही गरबा नृत्य सुरू झाले म्हणून असुरक्षित वाटले नाही, भीती वाटली नाही. पण, तसे रस्त्यावर वा इतर सार्वजनिक ठिकाणी नमाज पढणाऱ्यांबद्दल वाटत नाही. याचा विचार तर मुस्लिमांनीच करायला हवा.
पुढचा मुद्दा म्हणजे, लोकल रेल्वेमधील गरबा नृत्याला धर्मांध मुस्लिमांकडून विरोध केला जात असून त्याची तुलना रस्त्यावरील नमाजाशी केली जात आहे. पण, यातला महत्त्वाचा भाग म्हणजे, रस्त्यावर वा रेल्वे स्थानकावर कोणी नमाज पढायला सुरुवात केली की नंतर ती जागाच बळकावण्यासारखे उद्योग गरबा नृत्य करणाऱ्या महिलांकडून केले जात नाहीत.

देशात वर्षानुवर्षांपासून आणि आताही एखाद्या ठिकाणी अचानक दर्गा, मजारी, मशीद वगैरे उभी राहते. त्याआधी त्या ठिकाणी कोणी तरी मुस्लीम समुदायातील लोक नमाज पढण्याचे काम करत असतात. नंतर तिथे मुस्लिमांचे धार्मिक विधी होत असल्याने ती जागा आम्हालाच मिळायला हवी असे म्हणत त्यावर कब्जा केला जातो. असे अनेक अवैध दर्गे, मजारी, मशिदी कित्येक ठिकाणी दिसून येतात. त्याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे, कर्नाटकच्या बंगळुरू आणि हुबळीमध्ये ईदला नमाज पढण्यासाठी भाड्याने मिळालेल्या सार्वजनिक मैदानावर मुस्लिमांनी हक्क सांगत तिथे होणाऱ्या गणेशोत्सवाला विरोध केला. त्यापैकी हुबळीमधील मैदानात गणेशोत्सव झाला पण बंगळुरूत झाला नाही.

पण, गणेशोत्सवाला विरोध करण्यामागे संबंधित ठिकाणी आम्ही ईदचा नमाज पढतो म्हणून ती जागा आमच्या मालकीची झाल्याच्या आविर्भावातच मुस्लिमांनी विरोध केला. इथे तरी निदान कायद्याच्या चौकटीत राहून पुढची कार्यवाही झाली, पण इतरत्र बऱ्याच ठिकाणी तसे होत नाही अन् मुस्लिमांकडून जागा बळकावून आपल्या धार्मिक स्थळांची उभारणी केली जाते. म्हणूनच मुस्लिमांकडून रस्ता, रेल्वे स्थानक, विमानतळ, रुग्णालय वा मॉल वा अन्य सार्वजनिक ठिकाणी पढल्या जाणाऱ्या नमाज वगैरेला विरोध केला जातो. पण, लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य करणार्या महिलांनी तसे काही केलेेले नाही वा आतापर्यंत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा केल्या जाणाऱ्या मंडळांनीही कधी सार्वजनिक जागेवर दावा सांगितलेला नाही. त्यामुळे गरबा नृत्य आणि नमाजचीही कधीच तुलना होऊ शकणार नाही. तसेच, कोणालाही त्रास न होणार्या गरबा नृत्यालाही कोणी रोखू शकणार नाही.