१५ एप्रिल पासून सुरु होणार शासकीय योजनांची जत्रा… जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह न्युज : महाराष्ट्र शासनाकडून जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाहीत. आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणार्‍या शासकीय योजनांची  एक अभिनव जत्रा  शनिवार १५ एप्रिल पासून सुरू होणार आहे. ते 15 जूनपर्यंत चालणार्‍या या जत्रेत  27 लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

जनकल्याणासाठी अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र, त्या नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाहीत तसेच यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक दस्तावेज विविध कार्यालयांत जाऊन जमा करणे, हे कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रकि‘यांतून जावे लागते. दस्तावेज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार जावे लागते. कित्येक वेळा लोकांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचू शकत नाही.

त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थींना लाभ देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

 

एकाच छताखाली विविध विभाग

या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी १५ एप्रिल २०२३ ते १५ मे, २०२३ या कालावधीत  करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यींची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यींना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

 

मंत्रालय ते विविध यंत्रणांसाठी एसओपी

केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात येईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना  स्वयंस्पष्ट सूचना दिल्या जातील. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाईल. महानगरपालिकांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत संबंधित विभागीय आयुक्त व महानगरपालिका आयुक्त वेळोवेळी मार्गदर्शन करतील. या अभियानाच्या आयोजनासाठी निधी उपलब्धतेबाबतही शासन निर्णयात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयस्तर ते तालुकास्तर व विविध यंत्रणांसाठी कार्यपद्धतीही ‘एसओपी’ निर्धारित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने विविध स्तरावरील जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले आहे.योजनेची माहिती पोहचवून, अर्ज भरून घेणे ते लाभार्थ्यींची निवड आणि प्रत्यक्ष लाभ देणे इथपर्यंत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

या अभियानाचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षांना मुख्यमंत्री सचिवालयातील जनकल्याण कक्षास सादर करावा लागणार आहे.