शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार

तरुण भारत लाईव्ह ।२८ जानेवारी २०२३। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. या अर्थसंकल्पात काय नवीन घोषणा होणार हे पहाणं महत्वाचं ठरेल. दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही मदत आता आठ हजार रुपये होणार असल्याची माहिती मिळत आहे.

शेतकरी सन्मान निधीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनेची वार्षिक रक्कम आता सहा हजार वरून आठ हजार रुपये होणार आहे. सध्या वर्षातून तीन टप्प्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये पैसे जमा होत आहेत. हे पैसे आता चार टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतरानं दोन दोन हजार रुपये करून, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना खात्यात जमा  करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत एकूण 75 हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 2.25 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 31 मार्च 2019 रोजी थेट बँक ट्रान्सफर च्या माध्यमातून पहिला हफ्ता देण्यात आला आहे.
 मागील दोन वर्षामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभराच्या अर्थव्यवस्थेमध्ये काहीशी मंदी आली होती, भारताच्याही अर्थव्यवस्थेवर त्याचा काहीसा परिणाम झाला होता. त्यातून सावरल्यानंतर आता हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये नेहमी काही ना काही नवं असतं. पण या अर्थसंकल्पात  शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी उद्योगांसाठी, आरोग्य, शिक्षणाच्या दृष्टीनं नवीन काही योजना येणार का याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.