मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी! 36 तासांनी महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं

मुंबई : रायगडच्या इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  १०० पेक्षा जास्त नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच बचाव पथकाकडून एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही महिला तब्बल ३६ तासांपेक्षा जास्त काळ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी ठरली आहे. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असून हे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली होती. तर काल सायंकाळी खराब हवामानामुळे बचावकार्याचं काम थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी बचावकार्याला पुन्हा सुरूवात करण्यात आली होती.

या घटनेमध्ये अडकलेल्या १०० पेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. तर एका महिलेला मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं असून हा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.