मुंबईकडे निघालेले जरांगे माघारी फिरले; अंतरवाली सराटीमध्ये पोहचल्यानंतर म्हणाले…

 मुंबई : मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

वारंवार मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणारे मनोज जरांगे अंतरवालीतून मुंबईकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना चक्कर आल्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम भांबेरी गावात केला. त्यानंतर, आज सकाळी ते पुन्हा मुंबईकडे निघाले होते. मात्र समर्थकांच्या, पोलिसांच्या आवाहनानंतर भांबेरी गावातून जरांगे परत फिरले असून अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत.

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचं कारस्थान होतं, असा गभीर आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर, ते अंतरवालीतून मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र, रात्रीच त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांचा भांबेरी येथे मुक्का झाला. आज सकाळी जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ”उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू,” अशी भूमिका घेत जरांगे पाटील पुन्हा अंतरवालीत पोहोचले आहेत.

जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी भांबेरी येथे माध्यमांची संवाद साधला. सरकारने सांगितल्याशिवाय जिल्हाधिकारी संचार मधील लागू करू शकत नाहीत. आम्ही मुंबईकडे येऊ नये म्हणून संचार बंदी लावली. मात्र आज मी जिंकलो, फडणवीस हरले. सगसोयरेसह आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीसांना सुट्टी नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.  मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे सग्या-सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. लोकांचा विचार करुन मी आत्ता आंतरवलीत आलो आहे, असेही ते म्हणाले.

आरोप बिनबुडाचे – फडणवीस

मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. तसेच, माझ्यावर त्यांच्याकडून करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, हे त्यांनाही माहिती आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.