जळगाव : अकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाइन राबविण्यात येत असून, सोमवारी (२६मे) पासून विद्यार्थी नोंदणी सुरु झाली. मात्र, बुधवारी ( २८ मे ) रोजी तिसऱ्या दिवशीदेखील ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली. विद्यार्थी नोंदणीनंतर लॉगिन आयडी, पासवर्ड अवैध दाखवित असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघावतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मिळणारा लॉगिन आयडी व पासवर्ड अवैध दर्शविला जातो. त्यामुळे रजिस्ट्रेशन फी भरताना खूपच वेळ लागत आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा फॉर्म भरताना चुकल्यास तो डिलीट करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तरी डिलीट करण्याची सेवा उपलब्ध करावी. एआरसी सेंटर यांना लॉगिन पासवर्ड उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी व पालक यांचा त्रास कमी होईल.
मार्गदर्शन केंद्रास विद्यार्थी व पालकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे शक्य होईल, विद्यार्थी पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर नवीन पासवर्ड हा रजिस्टर ई-मेल आयडी व रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवावा, रजिस्ट्रेशनचा पार्ट – २ भरताना अत्यंत अडचणी येत आहेत.
विज्ञान शाखेसाठी इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम असा पर्याय न ठेवता एआयआय पर्याय देण्यात यावा. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नॉनक्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी, कारण फी ची सवलत त्यांना मिळत नाही, अशा विविध मागण्या आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश नोंदणी करणे सहज सोपे होण्यासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
नोंदणी करताना लागतोय वेळ
राज्यभर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. तीन दिवसापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने एरर येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक चांगलेच वैतागले आहेत. यात केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट सारखा एरर येत आहे. त्यामुळे नोंदणी करताना वेळ लागत आहे.