---Advertisement---
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे रविवारी (15 जून) दुपारी शेतात काम करीत असताना वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून, तरुण जखमी झाला आहे.
---Advertisement---
शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीकामांनाही शेतकऱ्यांनी वेग दिला आहे. कृषी विभागाकडून 15 जूननंतर पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यात रविवारी (15 जून) दुपारी विजांचा कडकटाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली.
तालुक्यातील आणि कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यालगतच्या कोंगानगर शेतशिवारात शेतीकामे करीत असताना वीज कोसळल्याने लखन दिलीप पवार (वय 14), दशरथ उदल पवार (वय 24, दोन्ही रा. कोंगानगर) व समाधान प्रकाश राठोड (वय 9, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय 35) जखमी झाले असून, त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार (महसूल), मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांना धीर दिला. पुढील मदतकार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनीही रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.